गांधीविचार: द्वेषमुक्त जगासाठी' या संवादसत्राला प्रतिसाद
पुणे : महात्मा गांधीसप्ताहा निमित्त ०२ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२२ दरम्यान 'जयहिंद लोकचळवळ 'ने 'गांधीविचार: द्वेषमुक्त जगासाठी' हे संवादसत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. संवादसत्रात वेगवेगळ्या देशातून आणि धर्मातून मान्यवर ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.संदीप वासलेकर,डॉ. सुधीर तांबे,उपाध्याय रविंद्र मुनिजी, आयुष चतुर्वेदी, सोनाली शिंदे, संकेत मुनोत, महंत रामसुंदर दास, चित्रलेखा जेम्स, नरेंद्रपाल सिंग, अब्दुल राजपुत,रेहान अल्लाहवाला, सीता अरकल, बरकत चरनीया, अब्दुल मलिक हमदर्द, सहभागी झाले. मयुरी गाडे यांनी सूत्रसंचालन केले.संकेत मुनोत यांनी संयोजन केले.
वक्त्यांनी आजच्या संदर्भात गांधीविचाराचे महात्म्य सांगितले आणि गांधी विचार आज देखील कसे सुसंगत आहे हे स्वतःच्या आयुष्यातील उदाहरणासह पटवून दिले.
या परिसंवादाच्या पहिल्या सत्रात हिंदू , मुस्लिम , जैन, शीख , ख्रिस्ती, बौद्ध या धर्मातील मान्यवरांनी गांधीविचार आणि त्या-त्या धर्मातील विचार यातील साम्य दाखवून देत आज ते द्वेष कमी करण्यासाठी कसे उपयुक्त आहेत ते सांगितले. जगातील अनेक देशांचे शांती सल्लागार संदीप वासलेकर यांनी महात्मा गांधी यांचे जगाला शांततापूर्ण मार्गाने सुसंघटित करण्यासाठी व संघराज्य पद्धतीने एकत्रित आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. डॉ. सुधीर तांबे यांनी; महात्मा गांधी यांची अहिंसा ही कशी आजच्या द्वेषमुक्त जगासाठी गरजेची आहे हे सांगताना, स्वतःच्या हितासाठी हिंसेचा वापर करणाऱ्या दृष्टप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रभावी उत्तर म्हणजे गांधीविचार, हे आपल्या भाषणातून अधोरेखित केले.उपाध्याय रविंद्र मुनिजी(जैन धर्मगुरू) यांनी सांगितले की, "जेव्हा जेव्हा जगात घृणास्पद प्रवृत्ती वाढू लागतात, त्याला आळा घालण्यासाठी शांतीची आवश्यकता असते. आज गांधीविचारांच्या लोकांनी एकत्रित येऊन याबद्दल कार्य केले पाहिजे.
या परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात प्रामुख्याने गांधीविचार आणि युवक या विषयावर भर देण्यात आला. आजची तरुणाई गांधीविचार आत्मसात करून स्वतःला आणि जगाला समृद्ध करू शकते ." असे आपल्या भाषणातून आयुष चतुर्वेदी(दिल्ली) यांनी सांगितले. "भारतातील सगळ्या लोकांना सॊबत घेऊन बदल घडवण्यासाठी गांधीविचार आवश्यक आहेत" असे विचार सोनाली शिंदे(पत्रकार) यांनी आपल्या भाषणात मांडले. तर संकेत मुनोत(पुणे) यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, महात्मा गांधी हे मजबुरीचे नाही तर मजबुतीचे नाव आहे. आज चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध निर्भयपणे भूमिका घेणे कसे गरजेचे आहे हे सांगत त्यांनी परिसंवादात सहभागी झालेल्या सर्व विचारवंतांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे गांधीजींच्या जीवनातील प्रसंगासह अधोरेखित करून गांधीविचारांचे महत्त्व पटवून दिले.
दोन सत्रात झालेल्या या परिसंवादात वरील मान्यवरांच्या सोबतच महंत राम सुंदर दास (छत्तीसगड), रेव्ह. चित्रलेखा जेम्स, नरेंद्र पाल सिंग, अब्दुल राजपूत, हिरालाल पगडाल, एस. नितीन, सचिन इटकर, रेहान अल्लाहवाला ( पाकिस्तान), सीता अरकल (तामिळनाडू), बरकत चरणिया, अब्दुल मलिक हमदर्द (अफगाणिस्तान) आदी जगभरातील मान्यवरांनी सहभागी होत द्वेषमुक्त जगासाठी गांधीविचार का महत्त्वाचे याबाबत आपले बहुमूल्य विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी गाडे यांनी , प्रमुख समन्वय संकेत मुनोत यांनी केला.

